
© 2026 Vivek Store. All rights reserved.
आधुनिक भारताच्या पुनर्जागरणाकरिता स्वामी विवेकानंदांचे विचार अत्यावश्यक आहेत. त्यांच्या विचारांमध्ये खर्या देशभक्तीची तीव्रता आणि कळकळ आहे. नव्या पिठीतील युवकांविषयी प्रेम आहे. आधुनिक भारताच्या पुनर्जागरणात स्वामीजींचे स्थान अद्वितीय असेच आहे. आपला भारत देश आर्थिक दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या प्रगती करीत आहे, तरीही हा नीतिमूल्ये, सूज्ञपणा, स्थैर्य, आत्मनिर्भरता, राष्ट्रीय एकता यांबाबतीत बराच मागे आहे. स्वामीजींच्या ओजस्वी वाणीमध्ये हे गुण आपल्या देशवासियांमध्ये विकसित करण्याची शक्ती आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांना अनुसरून आपण आपले राष्ट्र घडविले तर राष्ट्राचे पुनर्जागरण अवश्य होईल. स्वामी विवेकानंदांनी विशेषकरून युवकांना आवाहन केले आहे. स्वामीजींच्या विचारांमध्ये युवकांना भारताचे प्रबुद्ध नागरिक होण्यास शक्ती प्राप्त होऊ शकते. स्वामी विवेकानंद समस्त भारतीय युवकांचे नेते आहेत. गतकाळातील आध्यात्मिक जीवनमूल्यांना आत्मसात करून भारताचे पुनर्जागरण होईल असे त्यांनी निक्षून सांगितले आहे.