
© 2026 Vivek Store. All rights reserved.
भारत स्वतंत्र झाल्यापासून जनतेमधे — विशेषेकरून तरुणांमधे आपले राष्ट्र नव्याने घडविण्याचा प्रबळ उत्साह संचरल्याचे सर्वत्र आढळून येत आहे. ही गोष्ट अर्थातच स्तुत्य आहे. परंतु हे कार्य हाती घेण्यापूर्वी, भावी भारत कसा घडवायचा याची स्पष्ट कल्पना आपल्याला असायला हवी. आपल्याला काय चितारावयाचे याचे स्पष्ट चित्र मनश्चक्षूंपुढे आणल्यानंतरच चित्रकार पट चितारावयास सुरवात करतो. तसेच, एखादी इमारत बांधावयाची असल्यास इंजीनियर सर्वप्रथम, ती कशासाठी बांधण्यात येत आहे — ती शाळा आहे की इस्पितळ, ऑफीस आहे की राहण्याचे घर याविषयी संपूर्ण माहिती विचारून घेतो, मग तो तिचा नकाशा काढतो व तदनुसार ती बांधावयास सुरवात करतो. तद्वतच आपण देखील प्रथम भावी भारताचे स्वरूप कसे असावे याची स्पष्ट धारणा करून घेतली पाहिजे व मगच प्रत्यक्ष राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात उतरले पाहिजे.