
© 2026 Vivek Store. All rights reserved.
स्वामी विवेकानंदांसारख्या एका अलौकिक महापुरुषाचे निकट सान्निध्य लाभण्याचे सौभाग्य कित्येक भारतीय तसेच विदेशी व्यक्तींना प्राप्त झाले होते. स्वामीजींच्या या दैवी सान्निध्याची छाप या सर्वांच्या मनावर अमीट ठसा उमटवून गेली. अशा स्त्री-पुरुषांनी या आपल्या स्मृती लिपीबद्ध करून ठेवल्या आहेत. स्वामी विवेकानंद केवळ आध्यात्मिक विषयांवरच बोलत असत असे नव्हे तर बोलण्याच्या ओघात ते सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी विषयांचा देखील परामर्श घेत. या विविध विषयांबरोबरच स्वामीजींचे आपल्या मातृभूमीच्या पुनरुत्थानासंबंधीचे विचार देखील प्रकटत असत. हे सर्व विचार अत्यंत उद्बोधक असून जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणार्या व्यक्तींना त्यांपासून कशी स्फूर्ती मिळत असे हे देखील आपल्याला या आठवणींमधून दिसून येते. आठवणी ह्या एखाद्या छायाचित्रासारख्या असतात. छायाचित्र पाहिल्यावर ज्याप्रमाणे न पाहिलेल्या व्यक्तीचे व्यक्तित्व आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभे राहते, त्याचप्रमाणे ह्या आठवणींमुळे वर्णित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व दृष्टिगोचर होण्यास पुष्कळच मदत होत असते. ह्या स्मृर्तींमधून स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाच्या नानाविध पैलूंचे दर्शन तसेच त्यांच्या असाधारण अंतरंगाचे, त्यांच्या कार्यहेतूंचे आणि कार्याचे आकलन होण्यास मदत होईल ह्यात शंका नाही.